जीवधन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण

सह्याद्री प्रतिष्ठानचा(शिरूर)पुढाकार

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्याचे उध्वस्तावस्थेत असलेले प्रवेशद्वार नव्याने उभारण्याचा स्तुत्य उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान,शिरूर व शिवजन्मभूमी विभागाच्यावतीने राबविण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचा दुर्गार्पण सोहळा नुकताच पार पडला. सह्याद्री प्रतिष्ठानने गेल्या तीन वर्षात राज्यातील चौदा किल्ल्यांची उध्वस्तावस्थेत असलेली प्रवेशद्वारे लोकवर्गणीतून उभारली असून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

           जीवधन किल्ल्याचा कल्याण दरवाजा व त्या पुढील पायरी मार्ग इंग्रजांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केला होता.तेव्हापासून हा पायरीमार्ग दगड मातीने व्यापलेला होता.पायरी मार्गातला अडथळा दूर केल्याशिवाय प्रवेशद्वार बसवणे शक्य नव्हते म्हणून प्रतिष्ठानने प्रथम हे अडथळे दूर करण्याचा संकल्प केला.यानुसार नोव्हेंबर २०२० मध्ये प्रतिष्ठानने या कामाचा श्रीगणेशा केला. प्रतिष्ठानच्या १५० ते २०० दुर्गसेवकांनी वर्षभर दर शनिवार व रविवार श्रमदान करून प्रवेशद्वाराच्या मार्गातील अडथळे दूर केले.सीआयडीचे पोलीस अधीक्षक संभाजी कदम,अभिनेते विक्रम गायकवाड, अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते या प्रवेशद्वारचा दुर्गार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान व शिवजन्मभूमी विभागाचे शेकडो दुर्गसेवक उपस्थित होते.प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण होताच दुर्गसेवकांनी एकच जल्लोष केला.वर्षभर मेहनत घेऊन प्रवेशद्वार उभारल्याचे समाधान यावेळी दुर्गसेवकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
           गेली तेरा वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग संवर्धनाचे काम करीत असून किल्ल्यांच्या साफसफाईच्या  कामांमध्ये दुर्गसेवकांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे.तीन वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या विविध प्रकारच्या दुरुस्तीला परवानगी दिल्याने प्रतिष्ठानने तुंग,तिकोना,गोरखगड,कर्नाळा,तोरणा,सज्जनगड,सरसगड२,सिंहगड,कोथळीगड,हरिहर,हडसर,रतनगड,त्रिगलवाडी,जीवधन आदी किल्यांवर प्रवेशद्वार बसवण्याचे स्तुत्य कार्य केले आहे.याबरोबरच सिंहगड,कुलाबा,वेताळवाडी,कोरलाई,औसा, पद्मदुर्ग,संग्रामदर्ग,कोथळीगड,उंदेरी,चावंड,मंडणगड, बानकोट,डहाणू,भुदरगड व पावनगड या किल्ल्यांच्या ३२ तोफांना सागवानी तोफगाडे उभारण्याचेही काम केले आहे.जीवधन किल्ल्याचे प्रवेशद्वार सागवानी असून यासाठी दोन लाख रुपये तर किल्ल्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च आला.सह्याद्री प्रतिष्ठान, शिरूर व सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमी यांच्या वतीने लोकवर्गणीतून हा निधी उभारण्यात आला.इतरही किल्ल्याचे प्रवेशद्वार व तोफांना तोफगाडे सह्याद्री प्रतिष्ठानने (महाराष्ट्र) लोकसहभागातून उभारले आहेत.
कोरोना काळात प्रतापगडचा बुरूंज ढासळला होता.त्यावेळी देखील सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला.पुरातत्व,वनविभाग तसेच  खासदार उदयनराजे यांची परवानगी घेऊन प्रतिष्ठानने ढासळलेला बुरुंज उभारण्यासाठी लोकसहभागातून २१ लाख रुपये जमा केले.पुरातत्व विभागाच्या कंत्राटदाराकडून बुरुंज उभारण्याचे काम केले.
Leave A Reply

Your email address will not be published.