शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शहर विकास आघाडीच्या अनुपस्थितीत होणाऱ्या यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीकडे शिरूरकरांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून ही निवडणूक शिरूर नगरपरिषदेची आहे.शिरूर हवेली नगरपरिषदेची नव्हे याची जाणही ठेवणे गरजेचे आहे.
गेल्या पन्नास वर्षांच्या नगरपरिषद राजकारणाची परिस्थिती पाहता,या कालावधीत शहराचे राजकारण शहरातील नेत्यांभोवतीच फिरलेले आपण पाहिलेले आहे.सत्ताधारी व विरोधक हे शहरातीलच होते.माणिकचंद धारीवाल,हाशम खान पठाण,रसिकलाल धारीवाल,शहीदखान पठाण यांचे शहरावर वर्चस्व होते.ही मंडळी कधी एकत्र होती तर कधी एकमेकांविरोधात लढली.त्यांच्यात टोकाचे राजकीय मात्र वैचारिक मतभेद झालेही असतील.मात्र शहरावर या शहरातील मंडळींचाच कंट्रोल असायचा.हा कंट्रोल गावच्या भल्यासाठी होता.त्यांच्या कालावधीतील कोणत्याच आमदाराराने या मंडळींच्या कारभारात कधीच हस्तक्षेप केला नाही.गेल्या चौदा वर्षापासून प्रकाश धारीवाल यांची सत्ता शिरूरकरांनी अनुभवली.कुठेही त्यांचा नकारात्मक अनुभव आला नाही.याबाबत मत मतांतरे असतीलही मात्र धारिवालांच्या सत्तेत शिरूरकर स्वतःला सुरक्षित समजत होते.त्यांच्या कालावधीतही कोणत्याच आमदाराने त्यांच्याही कारभारात हस्तक्षेप केला नाही. धारीवाल यांचा यंदाच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय हा शहराच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू नये अशीच शिरूरकरांची अपेक्षा असावी.धारीवाल यांची एक्झिट होताच विविध पक्षांनी या निवडणुकीत एंट्री केली.जशी जमेल तशी या पक्षांनी उमेदवाराची जुळवा जुळव केली.धारीवाल बाजूला झाले आता एकदाची ही नगरपरिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी पक्ष सरसावले.शिरूर हवेलीचे हवेली स्थित आमदार माऊली कटके यात मोठ्या हिरीरीने पुढे आले.त्यांनी या निवडणुकीत फार गांभीर्याने लक्ष घातल्याचे दिसत आहे.सुरुवातीला नकारात्मक सूर असणाऱ्या माजी आमदार अशोक पवार यांनीही जनतेच्या आग्रहाखातर या निवडणुकीत भाग घेतला.